नीट परीक्षेतील अनियमिततेप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पक्षाकडून दिल्लीच्या जंतरमंतर येथे आंदोलनाची हाक दिली होती. मात्र विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागलं. त्यानंतर संपूर्ण देशातून विविध प्रतिक्रिया उमटत आहे. विरोधी पक्षाने सरकारवर निशाणा साधला आहे. तर, सीजेपीच्या आंदोलनावर महायुतीचे नेते सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इंडिया आघाडी दहशवाद्यांसारखं वातावरण निर्माण करत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देऊ नये, असंही त्यांनी म्हटलं आहे. सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
सदाभाऊ खोत काय म्हणाले?
इंडिया आघाडी दहशवाद्यांसारखं वातावरण निर्माण करत आहे. दहशतवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देऊ नये, असं विधान सदाभाऊ खोत यांनी केलं आहे. “‘नीट’संदर्भात देशांत एक षडयंत्र होत आहे. नीट पेपरफुटीनंतर जे दोषी होते त्यांना पकडले गेले आहेत. केंद्र सरकारने सांगितले आहे आम्ही दोषींना सोडणार नाही. नीटच्या परीक्षेशी ज्यांचा संबंध नाही ते लोक आंदोलन करत आहेत, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.
इंडिया आघाडी केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारबद्दल अफवा पसरवतायत, खोटे बोलत राहत आहेत. ते बोलत आहे आमचा यांच्याशी संबंध नाही. आगीत तेल ओतायचे काम चाललेलं आहे. इंडिया आघाडी आतंकवादी सारखे हे चालवत आहे. शिक्षण खात्यात अजिबात बदल करू नये. ह्यांना जसा तसे उत्तर द्यावे,” असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
सदाभाऊ यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया विचारली असता मुख्यमंत्र्यांनी सदाभाऊ काय बोलले मला माहिती नाही, असं म्हटलं आहे. तसंच, माझं मत असं आहे की, आंदोलन करणारे काही लोक चांगल्या भावनाने येणारे असू शकतात. मला त्यांच्याबद्दल बोलायचे नाही. पण त्यांच्यामधले काही लोक आपला अजेंडा घेऊन शिरलेले आहेत. हे स्पष्ट आहे. त्यांतील काही लोकांना नीट म्हणजे काय माहिती नाही. परीक्षा कधी झाली हेदेखील माहिती नाही. ते आपापला अजेंडा तिथे सांगून राहिले आहेत. याचा अर्थ काय सगळे काही एका दिशेने चालणारे एका विचाराने चालणारे आलेले नाहीत,’ असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
‘काही राजकीय पक्ष त्यांना ज्या ज्या राज्यात नाकारले गेलेय ते देखील या आंदोलनात आले आहेत. असे पक्ष यातून आपल्याला काही मिळवता येईल का? असाही प्रयत्न करताहेत, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
