खेल
रोहित, रहाणेऐवजी धवन, करुण नायर भारतीय संघात?
- 272 Views
- January 06, 2017
- By admin
- in खेल, समाचार
- 0 Comments
- Edit
इंग्लंडविरुद्धच्या तीन वन डे आणि तीन ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघांची निवड आज मुंबईत होणार आहे. एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील सीनियर निवड समितीच्या याच बैठकीत भारताचा वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांसाठीचा कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या नावावर शिक्कामोर्तब होईल.
महेंद्रसिंह धोनीने वन डे आणि टी ट्वेण्टी कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याने, आता तो कोहलीच्या नेतृत्त्वात खेळण्याची शक्यत आहे.
दिल्लीचा डावखुरा सलामीवीर शिखर धवन तंदुरुस्त असल्यास, इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या निमित्तानं त्याला भारतीय संघात पुनरागमनाची संधी मिळू शकते.
रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे हे अनुभवी फलंदाज अजूनही दुखापतीतून सावरलेले नाहीत. त्यामुळं लोकेश राहुलच्या साथीनं शिखर धवनला सलामीला खेळण्यासाठी भारतीय संघात संधी मिळू शकते. तसंच अजिंक्य रहाणेच्या अनुपस्थितीत करुण नायरलाही मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी भारतीय संघात हक्काचं स्थान मिळू शकतं.
धोनीला कर्णधार बनवणारा मराठमोळा माणूस!
करुण नायरनं इंग्लंडविरुद्धच्या चेन्नई कसोटीत त्रिशतक झळकावल्यानं, भारतीय संघाच्या निवडीत त्याचं नाव आघाडीवर आहे.
रवीचंद्रन अश्विन आणि जयंत यादव या ऑफ स्पिनर्सना झालेली दुखापत ही निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद आणि त्यांच्या सहकाऱ्यांची डोकेदुखी ठरू शकते.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अष्टपैलू कामगिरी बजावणारा अश्विन हा भारताच्या विजयाचा मुख्य शिल्पकार ठरला होता. त्यानंतर अश्विननं दुखापतीच्या कारणास्तव तामिळनाडूच्या रणजी करंडक सामन्यांमधून माघार घेतली होती. आता इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या सामन्यांदरम्यान त्याला आणखी विश्रांती द्यायची का, याविषयी निवड समितीला निर्णय घ्यावा लागणार आहे.
भारताचा दुसरा ऑफ स्पिनर जयंत यादवही दुखापतीच्या कारणास्तव इंग्लंडविरुद्धच्या चेन्नई कसोटीत खेळू शकला नव्हता. आता अश्विनसोबत जयंत यादवलाही विश्रांती द्यावी लागली, तर त्या दोघांचाही पर्याय निवडण्याचं आव्हान निवड समितीसमोर राहिल.