खेल
भारताची धूळधाण; ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय
- 173 Views
- December 18, 2018
- By admin
- in खेल, समाचार
- 0 Comments
- Edit
भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने १४६ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. शेवटच्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाला ५ गड्यांची आवश्यकता होती. सुमारे तासाभरात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी ५ बळी टिपले आणि सामना खिशात घातला. लॉयन आणि स्टार्कने ३-३ गडी बाद केले. सामन्यात ८ बळी टिपणाऱ्या लॉयनला सलामीवीर घोषित करण्यात आले.
चौथ्या दिवसअखेर भारताने ५ बाद ११२ धावांपर्यंत मजल मारली होती. भारताला विजयासाठी २८७ धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र दुसऱ्या डावात भारताची सुरूवात खराब झाली. राहुल शून्यावर माघारी परतला, तर भरवशाचा फलंदाज पुजारा ४ धावा करून बाद झाला. कोहली (१७), विजय (२०) आणि रहाणे (३०) यांनी काही काळ संघर्ष केला, पण तिघेही चांगली सुरुवात मिळाल्यानंतर बाद झाले. त्यानंतर आज दिवसाच्या खेळात आधी विहारी (२८), पाठोपाठ पंत (३०), उमेश यादव (२), इशांत शर्मा (०) आणि बुमराह (०) तासाभराच्या कालावधीत बाद झाले.
त्याआधी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २४३ धावांवर आटोपला. शमीने घेतलेल्या ६ बळींच्या जोरावर भारताला ऑस्ट्रेलियाला रोखणे शक्य झाले. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने सर्वाधिक ७२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात अतिशय संथ झाली होती. फिंचने ३० चेंडूत २५ धावा करत डावाला वेग देण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे तो ‘रिटायर्ड हर्ट’ झाला व तंबूत परतला. त्याच वेळी चहापानाची विश्रांती घेण्यात आली. अखेरच्या सत्रात बुमराहच्या चेंडूवर हॅरीस २० धावा काढून बाद झाला. पहिल्या डावात अर्धशतकाने हुलकावणी दिलेला शॉन मार्श (४५) दुसऱ्या डावात झेलबाद झाला. शमीने त्याला ५ धावांवर बाद केले. हँड्सकॉम्बही १३ धावांवर पायचीत झाला. तर पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करणारा ट्रेव्हिस हेड झेलबाद झाला आणि ऑस्ट्रेलियाचा चौथा गडी तंबूत परतला. हेडने केवळ १९ धावा केल्या. त्यामुळे तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाकडे १७५ धावांची आघाडी होती. आज उपहाराच्या विश्रांतीपर्यंत ऑस्ट्रेलियाने ४ बाद १९० धावसंख्येपर्यंत मजल मारून २३३ धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर मात्र यजमानांनी झटपट गडी गमावले.
तत्पूर्वी, नॅथन लॉयनने घेतलेल्या ५ बळींच्या जोरावर भारताचा पहिला डाव २८३ धावांवर संपुष्टात आला. पहिल्याच षटकात अजिंक्य रहाणे झेलबाद झाला. विहारीच्या साथीने कोहलीने डाव पुढे नेला आणि आपले शतक पूर्ण केले. मात्र त्यानंतर विहारी (२०), कोहली (१२३) आणि शमी (०) झटपट बाद झाले. ऋषभ पंतने काही काळ झुंज दिली पण तोदेखील ३६ धावांवर माघारी परतला. अखेर बुमराहला माघारी पाठवत लॉयनने भारताचा डाव संपवला.