देश,राजनीति
बुखारींच्या पाठिंब्याने तापले राजकारण
रविवार ६ एप्रिल २०१४ रामपूर/पाटणा/कोईम्बतूर : दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी काँग्रेस, राजद आणि तृणमूल काँग्रेसला सर्मथन देण्याचे आवाहन मुस्लीम समुदायाला केल्याने, मुस्लीम मतांवर डोळा असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आणि ज्यांची मुस्लीम मतांवर दारोमदार आहे, त्या समाजवादी पार्टीचे नेते आजम खान यांनी खळखळाट केला आहे. तर राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी बुखारी यांच्या सर्मथनाचे स्वागत केले आहे. बुखारी यांनी मुस्लिमांना केलेल्या आवाहनामुळे समाजात दुही निर्माण होऊ शकते. त्यामुळे काँग्रेसला सर्मथन देण्याच्या निर्णयावर फेरविचार करावा, अशी विनंती आजम खान यांनी बुखारी यांना केली. कमकुवत काँग्रेसला सर्मथन देण्याचे आवाहन केल्याने मुस्लीम मतदारांची शक्ती क्षीण होणार होईल आणि ही बाब भाजपासारख्या सांप्रदायिक शक्तीला लाभदायक ठरेल, असे आजम खान म्हणाले. भारतीय कम्युनिस्ट पार्टीने शाही इमाम यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. भारतातील मुस्लीम समाजाचे शाही इमाम बुखारी हे काही एकमेव स्वामी नाहीत, असे सीपीआयने म्हटले आहे. बुखारीयांनी पश्चिम बंगालमध्ये एकमेकांविरुद्ध लढणार्या काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसला पाठिंबा देण्याचे आवाहन करणे आश्चर्यजनक आहे. या दोन्ही पक्षांना कशाच्या आधारावर सर्मथन दिले, हे आपल्याला माहीत नाही. बुखारी यांच्या निर्णयावर अनेक धर्मगुरूंनी टीका केली आहे. त्यामुळे मुस्लीम समाज बुखारी यांचे आवाहन कसे घेणार हे माहीत नाही, असे सीपीआयचे सरचिटणीस सुधाकर रेड्डी म्हणाले. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी शाही इमाम बुखारी यांच्या सर्मथनाचे स्वागत केले आणि भाजपा व आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी केली. विभाजनवादी शक्ती प्रभावी असल्याचे दिसून येत आहे. इमाम बुखारी यांच्या आवाहनामुळे या शक्तीला रोखण्यास मदत होईल, असे सांगून नेहमी जातीयवादी भाषा वापरून शांती आणि सौहार्द बिघडविण्याचे काम करणारी भाजपा आणि आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी लालूप्रसाद यादव यांनी केली. बुखारींच्या धाकट्या बंधूंचा विरोध दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम बुखारी यांचे धाकटे बंधू सय्यद याह्या बुखारी यांनी काँग्रेसला सर्मथन देण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. काँग्रेसने मुस्लिमांचा विश्वासघात केल्याचे त्यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदींना गुजरातमध्ये मुस्लिमांचा नरसंहार केला, हे सर्वांना माहीत आहे. पण काँग्रेस यात दहापट पुढे आहे. कोणत्या पक्षाने मारले नसतील एवढे मुस्लीम काँग्रेसने मारले आहेत. भाजपा मुस्लिमांवर समोरून वार करते, पण काँग्रेस पाठीमागून हल्ला करते, असे याह्या म्हणाले. बुखारी यांनी मुस्लिमांना केलेल्या आवाहनामुळे समाजात दुही निर्माण होऊ शकते. त्यामुळे काँग्रेसला सर्मथन देण्याच्या निर्णयावर फेरविचार करावा. – आजम खान