खेल
बाप्पा, पोट्टे जिंकले ना ! विदर्भ सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक विजेता
- 194 Views
- February 07, 2019
- By admin
- in खेल, समाचार
- 0 Comments
- Edit
कर्णधार फैजल फजलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या विदर्भाच्या संघाने सलग दुसऱ्या हंगामात मानाच्या समजल्या जाणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम सामन्यात विदर्भाने सौराष्ट्रावर 78 धावांनी मात केली. विदर्भाचं हे रणजी करंडकाचं दुसरं विजेतेपद ठरवलं. विदर्भाने विजयासाठी दिलेलं 207 धावांचं आव्हान पार करताना सौराष्ट्राचा संघ 127 धावांपर्यंतच मजल मारु शकला. फिरकीपटू आदित्य सरवटेने विदर्भाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. पहिल्या डावात सौराष्ट्राच्या 5 फलंदाजांना माघारी धाडणाऱ्या आदित्यने दुसऱ्या डावातही सौराष्ट्राच्या 6 फलंदाजांना माघारी धाडलं.
सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या विदर्भाने पहिल्या डावात आदित्य कर्णेवारच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 312 धावांपर्यंत मजल मारली. मधल्या फळीतल्या फलंदाजांनीही विदर्भाची धावसंख्या उभारण्यात मोलाची भूमिका बजावली. प्रत्युत्तरादाखल सौराष्ट्राने पहिल्या डावात 307 धावांपर्यंत मजल मारली. स्नेल पटेलच्या शतकामुळे एका क्षणापर्यंत मजबूत वाटणारा विदर्भाचा संघ मोक्याच्या क्षणी कोलमडला. मात्र कर्णधार जयदेव उनाडकट आणि चेतन साकरिया यांनी अखेरच्या विकेटसाठी भागीदारी रचत विदर्भाच्या गोलंदाजच्या नाकीनऊ आणले. आदित्य सरवटे आणि आणि अक्षय वाखरेच्या भेदक माऱ्यामुळे विदर्भाने पहिल्या डावात 5 धावांची निसटती आघाडी घेतली.
दुसऱ्या डावातही विदर्भाच्या संघातील अखेरच्या फळीतल्या फलंदाजांनी किल्ला लढवत संघाला 200 धावांचा टप्पा गाठून दिला. पहिल्या फळीत गणेश सतीश तर मधल्या फळीतल्या फलंदाजांपैकी मोहीत काळे, आदित्य सरवटे, अक्षय कर्णेवार, उमेश यादव यांनी छोट्या पण तितक्याच महत्वपूर्ण खेळी उभारल्या. अखेरीस 200 धावांवर विदर्भाचा दुसरा डाव आटोपल्यानंतर सौराष्ट्राला विजयासाठी 206 धावांचं आव्हान देण्यात आलं.
मात्र दुसऱ्या डावातही सौराष्ट्राच्या फलंदाजांची पुरती भंबेरी उडाली. पहिल्या डावात शतक झळकावणारा स्नेल पटेलदेखील १२ धावांवर बाद झाला. यानंतर आदित्य सरवटेने भरवशाच्या चेतेश्वर पुजाराला शून्यावर माघारी धाडत सौराष्ट्राला मोठा धक्का दिला. यामुळे चौथ्या दिवसअखेर सौराष्ट्रची अवस्था ५ बाद ५८ अशी झाली. पाचव्या दिवशी विश्वराज जाडेजाने अर्धशतकी खेळी करत विदर्भाला झुंज देण्याचा प्रयत्न केला. त्याने 52 धावांची खेळी केली. मात्र तो माघारी परतल्यानंतर इतर फलंदाज फारकाळ मैदानावर टिकू शकले नाहीत. दुसऱ्या डावात विदर्भाकडून आदित्य सरवटेने पुन्हा एकदा आपली चमक दाखवली, त्याने 6 फलंदाजांना माघारी धाडलं. त्याला अक्षय वाखरेने 3 तर उमेश यादवने 1 बळी घेत चांगली साथ दिली.