देश
प्रवासी घटले; रेल्वेला ४०० कोटींचा फटका
- 54 Views
- January 27, 2020
- By admin
- in देश, समाचार
- 0 Comments
- Edit
भारतीय रेल्वेचे प्रवासी मोठ्या प्रमाणात घटले असून, प्रवासी वाहतुकीमुळे मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये रेल्वेला ४०० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. मात्र, मालवाहतुकीतील रेल्वेचे उत्पन्न वाढल्याचे समोर आले आहे. ही आकडेवारी या आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीची असून, माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे.
भारतीय रेल्वेला तिकिटे विक्रीतून मिळणारे उत्पन्न घटले आहे. रेल्वेला प्रवासी वाहतुकीतून मिळणारे उत्पन्न सुमारे ४०० कोटी रुपयांनी घटले आहे. तर दुसरीकडे मालवाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ झाली असून, यामुळे रेल्वेला २,८०० कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. यापूर्वी रेल्वेला मालवाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नात ३,९०१ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला होता. या तुलनेने रेल्वेला मालवाहतुकीत झालेला नफा उत्साहवर्धक म्हणावा लागेल. मालवाहतूक वाढावी, यासाठी रेल्वेने खूप प्रयत्न केले होते. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत.
मध्य प्रदेशातील माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी माहिती अधिकाराअंतर्गत रेल्वेकडे अर्ज सादर केला होता. या अर्जाला उत्तर देताना रेल्वेने माहिती दिली. या माहितीनुसार आर्थिक वर्ष २०१९-२० च्या पहिल्या तिमाहीत प्रवासी वाहतुकीमुळे रेल्वेला १३,३९८.९२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. दुसऱ्या तिमाहीत या उत्पन्नात घसरण होऊन ते १३,२४३.८१ कोटी रुपयांवर आले. तर तिसऱ्या तिमाहीत ही घसरण कायम राहून हे उत्पन्न १२,८४४.३७ कोटी रुपयांवर पोहोचले.