देश
देशद्रोहाच्या गुन्ह्य़ात उर्वशी चुडावालाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
- 55 Views
- February 06, 2020
- By admin
- in देश, समाचार
- 0 Comments
- Edit
देशद्रोहाचा गुन्हा नोंद असलेल्या उर्वशी चुडावाला (२२) या टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सच्या (टीस) विद्यार्थीनीचा अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी सत्र न्यायालयाने फेटाळला.
उर्वशीविरोधातील आरोप गंभीर असून पोलीस कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
आझाद मैदान येथे १ फेब्रुवारीला एलजीबीटी समुहाच्या मेळाव्यात सहभागी झालेल्या उर्वशीने ‘शार्जील तेरे सपानों को हम मंजील तक पोहोचाऐंगे’ अशी घोषणा दिली होती. शार्जीलला पाठिंबा देणारी घोषणा दिल्यामुळे मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांनी उर्वशीसह अन्य ५१ जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला. शार्जील जवाहरलाल नेहरु विद्यापिठाचा विद्यार्थी आहे. गेल्या महिन्यात अलीगढ विद्यापीठात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) भाषण देताना त्याने ईशान्य भारताबाबत आक्षेपार्ह टिपण्णी केली होती. त्याबद्दल शार्जीलला देशद्रोहाच्या गुन्ह्य़ात अटक करण्यात आली होती.
उर्वशीने अॅड. विजय हिरेमठ यांच्याकरवी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. बुधवारी या अर्जावर न्या. प्रशांत राजवैद्य यांच्या दालनात सुनावणी झाली. मुख्य सरकारी वकील अॅड. जयसिंह देसाई यांनी देशाचा शत्रू असलेल्या व्यक्तीला पाठिंबा व्यक्त करणे देशद्रोहच असल्याचा दावा आपल्या युक्तिवादात केला. एक दिवस आधी उर्वशी यांनी समाजमाध्यमावरून शार्जीलला पाठिंबा देणारा मजकूर प्रसारीत केला होता. शार्जील याला कोणत्याही अटी-शर्थीशिवाय मुक्त करावे, हे उर्वशी यांचे समाजमाध्यमावरील विधानही त्यांनी पुराव्यादाखल न्यायालयासमोर ठेवले.
पोलिसांनी उर्वशी यांना दुपारी दोन ते संध्याकाळी सहा या वेळेत अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
उर्वशी यांना बाजू मांडण्याची पुरेपूर संधी देण्यात आली. मात्र त्या पोलीस ठाण्यात आल्या नाहीत. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला, असेही अॅड. देसाई यांनी स्पष्ट केले. त्यांना अटक करून या प्रकराणाच्या मुळाशी जाणे क्रमप्राप्त असल्याने त्यांचा अर्ज फेटाळावा, अशी मागणी त्यांनी केली.