देश
उद्धव ठाकरेंच्या दबावामुळे मुंबई सेंट्रलला नाना शंकरशेठांचे नाव- आठवले
- 100 Views
- March 14, 2020
- By admin
- in देश, समाचार
- 0 Comments
- Edit
गेल्या १५ वर्षांपासून ‘रिपाई’कडून मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी होत आहे. मात्र, राज्य सरकारने तडकाफडकी मुंबई सेंट्रलला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्याचा ठराव संमत केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दबामुळेच हा निर्णय घेण्यात आला. आम्हाला हा निर्णय मान्य नाही, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. ते शुक्रवारी दिल्लीत ‘झी २४ तास’शी बोलत होते.
यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. मुंबई सेंट्रल स्थानकाला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्याच्या निर्णयाचा फेरविचार व्हावा. यासाठी मी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचीही भेट घेणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.
मुंबई सेंट्रलला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, ही आंबेडकरी जनतेची अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे. मुंबईत व्हीटी स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले. तसेच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालाही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई सेंट्रलला बाबासाहेबांचे नाव देण्यात यावे, अशी आंबेडकरी जनतेची मागणी होती, असेही आठवले यांनी सांगितले. त्यामुळे आता राज्य सरकार आपल्या निर्णयाचा फेरविचार करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.