देश
टँकर-कंटेनरच्या अपघातानंतर आग
- 60 Views
- February 06, 2020
- By admin
- in देश, समाचार
- 0 Comments
- Edit
शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर गरवारे पॉइंटलगत बुधवारी सकाळी पुढे जाण्याच्या चढाओढीत रासायनिक तेल घेऊन निघालेला टँकर आणि कंटेनरचा अपघात झाला. घर्षणाने कंटेनरला आग लागली. सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झाले नाही.
कंटेनरचा चालक कक्ष, काही यंत्रसामग्री आगीच्या विळख्यात सापडली. त्याच वेळी टँकरमधून ऑइलगळती सुरू होती. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने पाण्याचा मारा केल्याने दुर्घटना टळली. तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या काळात सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबईहून धुळ्याकडे जाणारी उड्डाणपुलावरील वाहतूक थांबविण्यात आली होती. अंबड औद्योगिक वसाहतीसमोर उड्डाणपुलावर हा अपघात झाला. याबाबतची माहिती सिडकोच्या अग्निशमन केंद्राने दिली.
सकाळी साडेनऊ वाजता मुंबईकडून आलेला कंटेनर धुळ्याच्या दिशेने जात असताना ऑइल घेऊन निघालेला टँकर त्याच्या पुढे जाण्याची धडपड करीत होता. पुरेशी जागा नसताना पुढे जाण्याच्या प्रयत्न टँकर आणि कंटेनर यांच्यात अपघात झाला. टँकरच्या घर्षणाने कंटेनर पुलाच्या भिंतीला धडकला. याच वेळी कंटेनरच्या पुढील कक्षाला आग लागली. तत्पूर्वीच चालक बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. या घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या सिडको केंद्रातील रवींद्र लाड, सुनील घुगे, बाळासाहेब लहामगे आदींच्या पथकाने धाव घेतली.
आगीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रारंभी उड्डाणपुलावरील दोन्ही बाजूंची वाहतूक थांबविण्यात आली. आग काही अंशी नियंत्रणात आल्यानंतर धुळ्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. परंतु, मुंबईहून धुळ्याकडे जाणारा मार्ग दीड ते पावणेदोन तास बंद ठेवावा लागला. ही वाहतूक समांतर रस्त्याने वळविण्यात आली. क्रेनच्या साहाय्याने पुलावरील अपघातग्रस्त टँकर, कंटेनर हटविल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोठा अनर्थ टळला
अपघातग्रस्त टँकरमधून ऑइलगळती सुरू झाली होती. कंटेनरच्या आगीची धग त्यापर्यंत पोहोचून मोठी दुर्घटना घडण्याचा धोका होता. पाण्याचा अखंडपणे मारा करत आग टँकपर्यंत जाणार नाही, याची अग्निशमनच्या जवानांनी दक्षता घेतली. समांतरपणे टँकरमधील ऑइलगळती थांबविण्यात आली. तासाभराच्या प्रयत्नानंतर कंटेनरची आग विझवण्यात आल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. आगीत कंटेनरचा दर्शनी कक्ष, काही यंत्रसामग्री, कुशन असे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.