देश
नामांतराच्या मुद्द्यावर एकत्र बसून चर्चा करुन योग्य मार्ग काढू : अजित पवार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरील ट्वीटमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केल्यानंतर काँग्रसने आक्षेप नोंदवला. नावं बदलून विकास होतो का, असं सवाल बाळासाहेब थोरात यांनी विचारला. त्यानंतर आता महाविकास आघाडीमधीलच आणखी एक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. हे तीन पक्षांचं सरकार आहे. आम्ही किमान समान कार्यक्रम ठरवला आहे. नामांतराच्या विषयी एकत्र बसून चर्चा करु आणि योग्य मार्ग काढू, असं अजित पवार म्हणाले. मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध विषयावर भाष्य केलं.
संभाजीनगर उल्लेखाबाबत काय म्हणाले
मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर केल्यानंतर बाळासाहेब थोरात आक्षेप नोंदवत हा नामांतराचा मुद्दा किमान समान कार्यक्रमात नाही असं म्हटलं. मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचं यावर काय मत आहे, याबाबत अजित पवार यांना विचारणा करण्यात आली. ते म्हणाले की, “मी मागील आठवड्यातच याबाबत बोललो होतो. हे तीन पक्षांचे सरकार आहे, किमान समान कार्यक्रम आम्ही तिघांनी ठरवला आहे. तिघांचे सरकार चालत असताना काही विषय कधी निघू शकतात. याबाबत एकत्र बसून चर्चा करुन योग्य पद्धतीचा मार्ग काढू. आज आमची बैठक आहे. या प्रकरणात नक्की काय झालं. जाणीवपूर्वक गडबड केली का या बाबी तपासल्या जातील. आम्ही एकत्र मार्ग काढू. कधीकधी अशाप्रकारच्या गोष्टी घडतात, यामागचं नक्की कारण काय आहे हे विचारुनच, शहानिशा करुनच याविषीय वक्तव्य करेन.”
मेट्रो कारशेड
गेल्या काही दिवसांपासून मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावरुन जोरदार राजकारण पाहायला मिळालं. आता या मुद्द्यात मुख्यमंत्री स्वत: लक्ष देत असून ते मार्ग काढतील, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. “महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर राज्याचे प्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे यांनी लक्ष घातलं होतं. मुंबईती जंगल असलेल्या परिसरात मेट्रो कारशेड करणं हे उद्धव ठाकरेंना पूर्वीपासूनच मान्य नव्हतं. मग कांजूरमार्गचा पर्याय समोर आला. काही जण म्हणतात ती जागा केंद्र सरकारची आहे, एक जण म्हणतो माझी आहे. राज्याचे अधिकारी म्हणतात राज्याची आहे. मुख्यमंत्री यात स्वतः लक्ष देत आहेत, ते मार्ग काढतील, असं अजित पवार म्हणाले.
प्रीमियम निर्णयावर विरोधकांची टीका
राज्य सरकारने अधिमूल्यात सवलत देत बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा दिला. परंतु या निर्णयावर भाजपने तीव्र आक्षेप नोंदवला. याबाबत अजित पवार म्हणाले की “विरोधकांना जाणीवपूर्वक तशी टीका करायची आहे, त्यांना दुसरं काम नाही. मुद्रांक शुल्काबाबत निर्णय घेतला, तेव्हाही विरोधकांनी टीका केली. तो निर्णय झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात खरेदीविक्रीचे व्यवहार झाले, यापूर्वी तेवढे कधीच झाले नव्हते. याचा फायदा सर्वांना झाला. ग्राहकांना शून्य टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यात आले. तीन टक्के आम्ही सोसलं, दोन टक्के बिल्डरांनी सोसले. म्हणजेच सदनिका घेणाऱ्यांचा पाच टक्के फायदा झाला. प्रीमियमचा निर्णय घेतानाही ग्राहक हित लक्षात घेतलं आहे. एसआरएचे अनेक प्रकल्प ठप्प आहेत. यातून प्रकल्पाच्या किंमती वाढत होत्या. त्यामुळे या निर्णयाचा फायदा सर्वसामान्य ग्राहकांनाच होईल. राज्यातील चार प्रमुख महापलिकेतील आयुक्तांनीही हा निर्णय करावा अशी विनंती केली होती. कोरोनाच्या काळात बांधकाम व्यवसाय ठप्प झाला आहे. कोणाला काम मिळत नव्हतं, त्याला उभारी येण्यासाठी हे केलं आहे. अतिशय विचारपूर्वक हा निर्णय केलेला आहे.”
अतिवृष्टी, अवकाळीसाठी केंद्राच्या मदतीची अद्यापही प्रतीक्षा
राज्यातील अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी केंद्राकडून अद्याप मदत आलेली नाही. आम्ही 10 हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं होतं. त्यातील दोन हजार कोटी रुपये द्यायचे राहिले होते, ते आजच आम्ही दिले आहेत. ही रक्कम कर्ज काढून दिली आहे, त्यामुळे आधीच्या निधीचे वितरण झाल्यानंतर आम्ही पुढील रक्कम दिली. अन्यथा व्याजाचा भुर्दंड पडतो, असं अजित पवारांनी सांगितलं.
जीएसटीची थकबाकी किती?
केंद्राकडून राज्याच्या जीएसटीची थकबाकी येणं बाकी असल्याचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून वारंवार सांगितलं जात होतं. केंद्राकडे राज्याची कालपर्यंतची जीएसटी थकबाकी 26 हजार कोटी रुपयांची आहे. मात्र आता दर आठवड्याला पैसे येण्यास सुरुवात झाली आहे, असं अजित पवारांनी सांगितलं.
ग्रामपंचायत निवडणूक
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे 12 नेते राज्यभरात प्रचार करणार असल्याचं कोअर कमिटीच्या बैठकीत निश्चित केलं. यावर अजित पवार म्हणाले की, “भाजपने काय करावं हा त्यांच्या पक्षाचा अधिकार आहे. कुठला ग्रामपंचायत सदस्य कुठल्या पक्षाचा हे कधी कळत नाही. कारण तिथे पक्षाचं चिन्ह नसतं. जे उमेदवार जिंकतात ते येतात आणि सांगतात आम्ही तुमच्याच पक्षाचे आणि काम करुन घेतात. मी 30 वर्ष ग्रामपंचायतीच्या निवडणुका पाहत आहे. आमच्या इथेही दोन गट उभे राहतात, जे निवडून येतात ते आम्हाला येऊन भेटतात आणि म्हणतात आम्ही साहेबांचेच.”
कृषी विभागाकडून ईडीने कागदपत्रं
ईडीने कृषी विभागाकडून काही कागदपत्रे मागितली आहेत. “एखाद्या चौकशी करणाऱ्या संस्थेने कुठल्या काळातील कागदपत्रं मागावीत हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी कागदपत्रे मागितली तर ती सादर करणं संबंधितांचं काम आहे. मी याबाबत कृषीमंत्र्यांशी बोलणार होतो, पण त्यांना कोरोना झाला आहे. असं काय झालं आहे का, याविषयी आज मी संबंधित सचिवांकडून माहिती घेणार आहे,” असं अजित पवार म्हणाले.
मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी स्वबळावर जाणार का?
आगामी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्धार काँग्रेसने केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीही स्वबळावर निवडणूक लढवणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यावर अजित पवारांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, “राष्ट्रवादीची भूमिका मित्रपक्षांबरोबर आघाडी करुन पुढे जायचं अशी चर्चा सुरु आहे. अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार पवार साहेबांना आहे. मतांची विभागणी होऊ नये यासाठी आघाडी करावी, असं माझं मत आहे. ना तुला, ना मला, ना तिसऱ्याला असं होऊ शकतं.त्यामुळे आघाडीबाबत मी सकारात्मक आहे. आम्ही याबाबत बाळासाहेब थोरात, भाई जगताप यांच्याशी चर्चा करु. महाविकास आघाडीला कुठे अडचण न येता स्थानिक स्वराज्य संस्थेत यश मिळावे असा आमचा प्रयत्न असेल.”
प्रकाश आंबेडकर यांच्याकडून पुण्याच्या नामांतराची मागणी, अजित पवार म्हणतात…
औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याची शिवसेनेची भूमिका असताना, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादऐवजी पुण्याचं नामांतर संभाजीनगर करा अशी मागणी केली आहे. याबाबत विचारणा केली असता अजित पवार म्हणाले की, “कुणी काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. कुणी भावनिक मुद्दे काढलं, कुणी विकासाबद्दल बोलतं, कुणी नामकरणाबद्दल बोलतं. राज्याच्या 60 वर्षाच्या इतिहासात अशा अनेक गोष्टी झाल्या आहेत. कोण औरंगाबादबद्दल बोलतं, कोण नगरबद्दल बोलतं, आता पुण्याबद्दल बोलत आहेत. बातम्या येतात, त्यामुळे आणखी कुणाला काय काय सुचायला लागतं. मागणी करण्याचा त्यांचा अधिकार आहे. आपण अनेक विमानतळांना मान्यवरांची नावं दिलेली पाहिली आहे. उत्तर प्रदेशात मायावती आल्यानतंर त्यांनी अनेक जिल्ह्यांची, शहरांची नावं बदलून टाकलं. लोकशाहीत जे निवडून येतात त्यांना बहुमताच्या जोरावर काही अधिकार असतात. त्या अधिकाराचा वापर कसा करावा हा ज्याने त्याने आत्मचिंतन करुन निर्णय घ्यावा. काहींचे मुद्दे बरेच वर्ष डोक्यात होते. त्यावेळी ते पुढे रेटता आले नाही. आता त्यांना वाटतंय हा प्रश्न सुटावा. पण हा प्रश्न सुटत असताना महाविकास आघाडी टिकावी अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. योग्य तो मार्ग निघावा. विकासकामांना महत्त्व द्यावं, ही भूमिका शरद पवारांची आहे. आम्हीही याच भूमिकेचं समर्थन करुन पुढे जात आहोत.”
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.